पुणे

पुस्तकातील कोरी पानेही हवीहवीशी : बालभारतीच्या अहवालातील माहिती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दुसरी ते आठवीच्या पुस्तकांना जोडलेली वह्यांची पाने विद्यार्थ्यांना आता आवडू लागली आहेत. 37 हजार 803 शिक्षकांनी दिलेल्या सर्व्हेतून 36 हजार 857 शिक्षकांनी ही पाने विद्यार्थ्यांना आवडत असल्याचे सांगितले आहे. हे प्रमाण 97.50 टक्के इतके आहे, तर अनेकांना ही पुस्तके मिळाली नसल्याचीही तक्रार राज्यातील विद्यार्थी व पालकांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजे बालभारतीने यंदापासून पहिली ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांच्या रचनेत बदल केला आहे.

दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात आली असून, विद्यार्थ्यांना त्यावर महत्त्वाच्या नोंदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या उपक्रमाची उपयोगिता व यशस्विता सर्वेक्षणाच्या माध्यमातून बालभारतीकडून करण्यात आली. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. पाठ्यपुस्तकात असलेल्या वह्यांच्या पानांचा उपयोग आणि फायदा यावर 12 प्रश्न विचारले होते. हा सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने पुस्तकातील कोर्‍या पानांचा उपयोग होत असल्याचे समोर आले आहे.

अद्याप सर्वेक्षणातील 4.88 टक्के विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तकेच मिळाली नसल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणात 22 हजार 193 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यातील 1 हजार 83 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेच मिळालेली नसल्याचे म्हटले आहे. एकूण 22 हजार 193 विद्यार्थ्यांपैकी 21 हजार 110 (95.12 टक्के) विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तके मिळाल्याचे उघडकीस आले, तर 16 हजार 386 विद्यार्थ्यांना एकूण 4 पाठ्यपुस्तके मिळाली. 844 विद्यार्थ्यांना तीन, 3 हजार 729 विद्यार्थ्यांना दोन, तर 1 हजार 234 विद्यार्थ्यांना आतापर्यंत केवळ एकच पाठ्यपुस्तक देण्यात आले. त्यामुळे 73.84 टक्के विद्यार्थ्यांनाच एकात्मिक पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत चार पाठ्यपुस्तके आतापर्यंत मिळाल्याचे समोर आले आहे.

पुस्तकाचे ओझे झाले कमी

97.50 टक्के शिक्षकांच्या मते वह्यांची कोरी पाने विद्यार्थ्यांना आवडतात.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी झाल्याचे 96.79 टक्के शिक्षक म्हणतात.
90.49 टक्के शिक्षक सांगतात 'माझी नोंद' या उपक्रमात या कोर्‍या पानांचा वापर करतात.

सर्वेक्षणात 14,356 पालक

दप्तराचे ओझे कमी झाले का? या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 38.25 टक्के पालकांनी एकात्मिक पाठ्यपुस्तकांमुळे दप्तराचे ओझे अंशत: कमी झाल्याचे म्हटले आहे.
21. 93 टक्के पालकांनी दप्तराचे ओझे तेवढेच असल्याचे सांगितले.
पुस्तकातील पानांवर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदी 93.72 टक्के पालक पाहतात.
46.41 टक्के पालकांच्या मते विद्यार्थ्यी या पानांचा वापर स्वयंअध्ययनासाठी करतात.

सर्वेक्षणातील 22,193 विद्यार्थी सांगतात

एकात्मिक पुस्तके 68.90 टक्के विद्यार्थ्यांना खूप छान वाटतात.
96.49 टक्के विद्यार्थी वर्गात वह्यांच्या पानांवर नोंदी घेतात.
3.51 टक्के विद्यार्थी या पानांचा वापर करीत नाहीत.
14 हजार 960 विद्यार्थी सर्व विषयांसाठी रोज या कोर्‍या पानांचा वापर करतात.
वर्गात शिकत असताना नोंदी घेणे सोपे जाते, असे 21 हजार 244 विद्यार्थ्यांना वाटते.
10 हजार 312 विद्यार्थ्यांनी सर्वच कोर्‍या पानांवर नोंदी लिहिल्या आहेत.
19.58 टक्के विद्यार्थी जे सुचेल ते या पानांवर लिहितात.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT