भोर; पुढारी वृत्तसेवा : मागील आठ दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी तसेच अशक्तपणाने भोर तालुक्याच्या गावागावांतील नागरिक त्रस्त झाले आहेत. रुग्णांची उपचारांसाठी दवाखान्यांमध्ये मोठी गर्दी वाढली आहे. रात्रभर गारठा, दिवसा उष्णता, अशा वातावरण बदलामुळे भोर तालुक्याच्या ग्रामीण भागात थंडी, ताप, सर्दी, खोकला तसेच अंगदुखी या आजारांनी डोके वर काढले आहे. मागील 15 दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. दवाखान्यांमध्ये उपचारांसाठी लहानांपासून ज्येष्ठ रुग्णांची रीघ लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. संसर्गजन्य आजारांमुळे सध्या घबराटीचे वातावरण आहे.
पुढील तीन-चार दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने संसर्गजन्य रोगाची साथ कायम राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन औषधोपचार घ्यावेत.
– डॉ. सूर्यकांत कर्हाळे, वैद्यकीय अधिकारी, भोर तालुका