पुणे

पर्यावरणप्रेमी-प्रशासनात हवा समन्वय ; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मत

अमृता चौगुले

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : नदीकाठ सुधार योजनेत झाडे तोडली जाणार आहेत. परंतु प्रशासनही झाडे वाचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे आंदोलकांनी पॅनिक होऊन चालणार नाही. आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी दीर्घकाळ काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रशासनासोबत समन्वयातून मार्ग काढण्याची गरज आहे, असे मत वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. पुणे महापालिकेच्या वतीने जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रुंदीकरणाच्या कामात येणारी खडकी येथील 65 जुनी झाडे काढून रस्त्याच्या कडेला त्यांचे पुनर्रोपण करण्यात येत आहे.

यामध्ये वडाच्या 22 झाडांचा समावेश आहे. मंगळवारी नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या बंडगार्डन येथे सुरू असलेल्या कामासोबतच वेताळ टेकडी येथील नियोजित रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सयाजी शिंदे यांनी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी खडकी येथे वटवृक्ष पुनर्रोपण सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. याप्रसंगी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, उपअभियंता विनोद मुरमुरे, वृक्ष प्राधिकरणचे सदस्य संदीप काळे आदी उपस्थित होते.

वृक्षतोड झाली की वाळवंट होण्याची सुरुवात होते, हे आपण राजस्थानमध्ये पाहिले आहे. पूर्वी तेथे खूप झाडे होती. परंतु महापालिका झाडांचे पुनर्रोपण करून त्यांची जोपासना करत आहे, हे कौतुकास्पद आहे.

                                                     – भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT