पुणे; पुढारी वृत्तसेवा : ट्रस्ट, ट्रूथ, ट्रेडिशन, टेक्नॉलॉजी आणि टीमवर्क या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास सहकारी बँका आव्हानांना समर्थपणे तोंड देऊ शकतात. मात्र, अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यासाठी कर्मचार्यांनाही टेक्नोसॅव्ही केले पाहिजे; अन्यथा नागरी सहकारी बँकांच्या प्रगतीत अडसर येऊ शकतो, असे मत दी कल्याण जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी असोसिएशनतर्फे आयोजित ऑनलाइन सहकार सप्ताहाच्या दुसर्या दिवशी खिरवाडकर 'नागरी सहकारी बँकांसमोरील आव्हाने' या विषयावर बोलत होते.
ऑनलाइन व्याख्यानात असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, प्रा. अनिल करंजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे यांच्यासह राज्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर, बँक प्रतिनिधी सहभागी झाले होते. सुरुवातीस प्रा. करंजकर यांनी प्रास्ताविक केले. अॅड. मोहिते यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनांविषयीची भूमिका स्पष्ट केली. असोसिएशनच्या कार्याविषयीचा माहितीपट या वेळी प्रदर्शित
करण्यात आला.
खिरवाडकर म्हणाले, अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याचा काही बँकांचा कल नसतो. बदलत्या काळानुसार अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब केला नाही, तर बँका अडचणीत येऊ शकतात. बँकांसाठी सॉफ्टवेअर निवडताना बँकेच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार सॉफ्टवेअरची योग्य निवड करणे अपेक्षित आहे. सहकारी बँका आव्हाने स्वीकारण्याऐवजी त्याविरुद्ध भांडतात. तसे न करता वस्तुस्थिती पाहून बँकांनी कामकाज केले पाहिजे. रिझर्व्ह बँकेकडून येणार्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून त्याप्रमाणे कामकाज चालविले पाहिजे.
प्रभावी तंत्रज्ञानासह पारदर्शकतेने आव्हानांवर मात
रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकांच्या संचालक मंडळाची निवडणूक, तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती, याविषयी त्यांनी कायद्याच्या अनुषंगाने टिप्पणी केली. योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रशिक्षित कर्मचारीवर्ग तसेच व्यवहारात पारदर्शकतेचा अवलंब केल्यास नागरी सहकारी बँका आव्हानांवर मात करू शकतील, असा विश्वासही खिरवाडकर यांनी व्यक्त केला.