अनिल तावरे :
सांगवी : गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी थंडी पोषक असते. परंतु, फेब्रुवारी महिन्यातच तापमानात कमालीची वाढ झाली असल्याने गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात दिवसा तापमानात वाढ झाली असल्याने गव्हाच्या पिकासह तरकारीच्या पिकांना धोक्याची घंटा मानली जात आहे.
भारत हा जगातील गव्हाच्या उत्पादनात दुसर्या क्रमांकावर आहे. मात्र गेल्या वर्षीही फेब्रु वारी महिन्याच्या अखेरीस तापमानात कमालीची वाढ झाल्याने गव्हाच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे गव्हाच्या विक्रीचा दर चांगलाच वाढला होता. यंदाही फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानात कमालीची वाढ झाल्याने गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशात महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये गव्हाच्या उत्पादनात महत्त्वाची मानली जातात. दरवर्षीपेक्षा गेल्या वर्षापासून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस 3 ते 5 अंश सेल्सिअस तापमान वाढीमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
बारामती तालुक्यातील बागायती पट्ट्यात उसाचे क्षेत्र मोकळे झाल्यानंतर बहुतेक शेतकर्यांनी गव्हाच्या पिकांची लागवड केली आहे. बहुतेक भागांतील गव्हाची पिके परिपक्व झालेली आहेत. तर काही पिके फुलोर्यात व चिकात आहेत. ही परिस्थिती असताना गेल्या दोन दिवसांपासून तापमानात अनपेक्षितपणे वाढ झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
गव्हाबरोबरच बहुतांश शेतकर्यांनी कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी, गवार, ढोबळी मिरची, हळद, आले, मेथी, शेपू, कोथिंबीर, पालक, चाकवत, करडई, तर फळबागांमध्ये डाळींब, पेरू, केळी, पपई याही पिकांवर तापमानात अनपेक्षितपणे वाढ झाल्याने परिणाम होण्याची शक्यता आहे.
पाणीपातळी खालावणार
या तापमानवाढीचा परिणाम विहीर व विंधन विहिरीतील (बोअरवेल) पाणीपातळी खालावली जाण्याची शक्यता बळावली आहे. एकूणच, अनपेक्षित तापमानात कमालीची वाढ झाल्याने शेतकरी सर्वच बाजूंनी संकटात सापडला आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, ही पिकांसाठी हानिकारक आहे. यामुळे मावा, तुडतुडे आदींचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळे शेतकर्यांनी वेळोवळी औषध फवारणी करावी.
आर. डी. कदम, कृषी सहायक, सांगवी