मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूरच्या पूर्व भागामध्ये उसाला ऊसतोडी मिळत नसल्यामुळे या भागातील शेतकरी हैराण झाले आहेत. चालू वर्षी घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू न झाल्यामुळे इतर तालुक्यांतील व जिल्ह्यातील कारखान्याच्या टोळ्या मर्यादित भागांमध्ये आल्या आहेत. शेतकरी आपल्याला ऊसतोडी मिळावी म्हणून शेतकी कार्यालयात जाऊन अधिकार्यांना 'साहेब आम्हाला टोळी कधी मिळणार', अशी विनवणी करू लागले आहेत. शिरूरच्या पूर्व भागामध्ये श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, गौरी शुगर, अंबालिका शुगर, दौंड शुगर, व्यंकटेशर शुगरसह निराणी ग्रुपचा भीमा-पाटस आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आदी कारखान्यांच्या ऊस टोळ्या व हार्वेस्टर ऊस तोडण्यासाठी आले आहेत. या भागातील अनेक शेतकर्यांनी इतर साखर कारखान्यांमध्ये आपल्या उसाची नोंद केली आहे. परंतु, ऊस टोळ्या कमी असल्याचे शेतकी अधिकार्यांकडून शेतकर्यांना सांगितले जात आहे. वेळेमध्ये उसाचे गाळप झाले नाही, तर उसाच्या वजनामध्ये गट होत आहे. त्याचा नाहक भुर्दंड शेतकर्यांना सोसावा लागत आहे.
वेळेत ऊसतोड होत नसल्याने नुकसान
घोडगंगा कारखाना चालू झाला असता, तर ऊसतोडीसाठी येथील शेतकर्यांना इतर साखर कारखान्यांच्या मागे पाळावे लागले नसते. ऊस वेळेवर तुटून गेल्यावर शेतकर्यांना फायदा झाला असता. परंतु, ऊस वेळेमध्ये तुटला जात नाही. परिणामी, जास्त बाजारभाव मिळूनही शेतकर्यांचे नुकसानच होणार असल्याचे घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे व माजी संचालक सुधीर फराटे इनामदार यांनी सांगितले.
ऊसतोड मजुरांची संख्या कमी आहे. हार्वेस्टर मशिन शेतात जात नाही, अशी अनेक कारणे सांगून शेतकर्यांची दिशाभूल होत आहे. सहकार आणि खासगी कारखाने यांचे पदाधिकारी शेतकर्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आमचा ऊस कोण घेऊन जाणार, असा प्रश्न पडला आहे.
– राजन गरुड,ऊस उत्पादक शेतकरी
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.