भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : दोन साखर कारखान्यांमध्ये अंतराच्या अटीची मर्यादा असल्यामुळे नवीन साखर कारखाने उभारणीत अडथळे येत आहेत. कारखान्यांची भरमसाठ गाळप क्षमता वाढण्यापेक्षा नवीन साखर कारखाने उभा राहिल्यास ऊस उत्पादकांना लाभ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. इतर उद्योगांत नाही, परंतु दोन साखर कारखान्यांत 25 किलोमीटर अंतराची अट आहे. राज्यात नवीन सहकारी साखर कारखाना उभारणीसाठी परवानगी नाही. परंतु, खासगी साखर कारखान्यासाठीही अंतराची अट आहे.
परिणामी, ऊसपट्ट्यात नवीन साखर कारखान्यासाठी जागा शिल्लक नाही. एकीकडे अंतराच्या अटीची मर्यादा असूनही अनेक नवीन उद्योजक साखर कारखाने उभारण्याच्या मानसिकतेत आहेत. सरकार गाळप क्षमता वाढीस मुभा देत असल्याने येत्या हंगामात अनेक साखर कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता पंधरा ते वीस हजार टन होण्याची शक्यता आहे.
2022 -23 च्या हंगामात राज्यातील साखर कारखानदारांकडून एक लाख 74 हजार 270 लाख टन दैनिक गाळप क्षमतावाढीचे अर्ज दाखल आहेत. शासनाने कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यापेक्षा दोन साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करून नवीन कारखान्यांना परवानगी दिली पाहिजे.
दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द झाल्यावर नवीन साखर कारखाने उभे राहतील. परिणामी, ऊसदराची स्पर्धा होईल.
हनुमंत वीर, अध्यक्ष, जिल्हा शेतकरी संघटना.