भोसरी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी येथे कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 726 वा संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक व वारकरी दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येतात. त्याचाच एक भाग पोलिस यंत्रणेबरोबरच आपत्ती व्यवस्थापन संघ, महाराष्ट्र या टीममधील सदस्य कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार नदी पात्रात घडू नये यासाठी वारकर्यांच्या सेवेसाठी इंद्रायणी नदीकाठी सज्ज झाला आहे.
कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा दर्शनासाठी लाखो भाविक आळंदी येथे दाखल होत आहेत.
माऊलीची दर्शन घेण्याआधी वारकरी व भाविक इंद्रायणी नदीत स्नान करतात. या दरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवितहानी होण्याच्या घटना ही घडू शकतात. हे टाळण्यासाठी भोसरी येथील आपत्ती व्यस्थापन संघातील संतोष शेलार, विजय लांडे, संदीप गव्हाणे, करीम सय्यद, दिलीप गायकवाड आणि संघातील इतर सदस्य यात्रा सुरक्षा नियोजनात सहभागी झाले आहेत. वारकर्यांना सुरक्षित राहण्याबाबत , खोल पाण्यात न जाणे, आपल्या मौल्यवान साहित्याची काळजी घेणे, आदी गोष्टींचे आवाहन करण्यात येत असल्याचे अध्यक्ष संतोष शेलार यांनी सांगितले.