न्हावरे : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या चुकीच्या कारभारामुळे सध्या बंद आहे. संबधित संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करून कारखाना सुरू करावा, यासाठी कारखाना कार्यस्थळावर भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पांचगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी बुधवार (दि. 27)पासून धरणे आंदोलन सुरू केले.
गेल्या गळीत हंगामात 33 लाख रुपये नफा होऊनही जाणीवपूर्वक घोडगंगा साखर कारखाना बंद पाडण्याचा कट रचला असून याला अध्यक्ष व संचालक मंडळ जबाबदार असल्याने शासनाने प्रशासक नेमून कारखाना सुरू करणे गरजेचे असल्याने हे आंदोलन सुरू केल्याचे संजय पाचंगे म्हणाले. दरम्यान, दि. 1 जानेवारी 2024 पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र निंबाळकर, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष संपत फराटे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, कामगार नेते तात्यासो शेलार, महादेव मचाले, संदीपराव महाडीक, शेतकरी संघटनेचे शरद गद्रे, ठकसेन ढवळे, महेंद्र काशिद, बापूसाहेब कोळपे, शंकर मासाळ, दत्तात्रय रणपिसे, शामकांत मोहिते आदी उपस्थित होते.
आंदोलनस्थळी उसाच्या पाचटाचे अंथरूण
पाचंगे यांनी साखरेचा बारदाना अंगात घालून त्यावर 'घोडगंगा बचाव शेतकरी बचाव-कामगार बचाव' असे लिहिले असून, कुठलाही मांडव न घालता उसाचे पाचट अंथरुण पसरून त्यावर बैठक मारली आहे.