पुणे

पुणे : भाजपचा अहंकार मोडीत काढा ; सुषमा अंधारे यांची टीका

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून केंद्रीय संस्था आणि तपास यंत्रणांचा हवा तसा गैरवापर केला जात आहे. हवे ते निर्णय घेतले जात आहेत. यातून भाजपनेत्यांमध्ये निर्माण झालेला अहंकार मतदारांनी मोडीत काढावा,' असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ लोहियानगर येथे मंगळवारी झालेल्या सभेत अंधारे बोलत होत्या. या वेळी माजी मंत्री सुनील केदार, आमदार संग्राम थोपटे, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.

'कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक का प्रतिष्ठेची केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे,' त्यावर अंधारे म्हणाल्या, 'ही निवडणूक किती वर्षासाठी आहे, हे महत्त्वाचे नाही. तर यातून भाजपला उत्तर देण्याची वेळ आहे. अंध भक्तीवर निवडणुका जिंकायचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. जो कोणी महत्त्वाच्या विषयांवर प्रश्न विचारेल, त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे.'

'ही निवडणूक देशाची लोकशाही आणि संविधान वाचवायचा निर्णय घेण्याची आहे. देशातील एकाधिकारशाही रोखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. नुकतीच पार पडलेली शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा बाल्लेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे, त्या निवडणुकीत सुशिक्षित मतदार होते. त्यांनीच भाजपला घरचा रस्ता दाखवला आहे. आता कसबा आणि चिंचवडमध्ये मतदार भाजपला धडा शिकवतील,' असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते घोषणा देत होते. त्या वेळी सुषमा अंधारे यांनी, 'फुले-शाहू-आंबेडकर निवडून येतील धंगेकर…' अशी घोषणा दिली. त्या वेळी उपस्थितांनी एकच जल्लोष करीत घोषणा दिल्या.

SCROLL FOR NEXT