पुणे

मजुरी देऊनही कांदा लागवडी खोळंबल्या; महाळुंगे परिसरात विजेचा लपंडाव

अमृता चौगुले

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा : साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, चास गावांमध्ये कांदालागवडींना वेग आला आहे. कांदा रोपे लावण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने लागवडींना खोळंबा येत आहे. आगाऊ मजुरी देऊनही काम रखडल्याने कांदा उत्पादक त्रस्त झाले आहेत. कांदा पिकासाठी यंदा पोषक वातावरण आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगले बाजारभाव राहतील, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.

त्यातच कांद्याची रोपे तरारली असून, लागवडीसाठी महिला मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी वाढीव मजुरी व आगावू रक्कम देवून महिला मजूर लागवडीसाठी तालुक्याच्या इतर भागांतून चारचाकी वाहनांतून आणले जात आहेत. अनेक महिला उकत्या स्वरूपात लागवड घेतात. एकरी सुमारे आठ ते बारा हजार रुपये भाव लागवडीसाठी सध्या चालू आहे. मात्र, रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. अशावेळी वीज खंडित होत असल्याने समस्या होत आहे.

नारायणगाव, आळेफाटा या भागांतून 33 केव्ही विद्युतपुरवठा कळंब परिसरात वारंवार खंडित होत आहे. परिणामी, शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी देणार्‍या मोटारी बंद पडत आहेत. मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करून कांदा पीक शेतात घेण्यासाठी शेतकरी पूर्वतयारी करत आहेत. पण, विजेअभावी पैसा, श्रम वाया जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गहू, हरभरा, बटाटा, पालेभाज्या वर्गीय पिके यांनाही पाण्याची नितांत गरज आहे.

डावा कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी
हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या डावा कालव्यातून प्रथमच पूर्ण क्षमतेने पाणी सोडले आहे. पोटचार्‍या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पण, विद्युतपुरवठ्याअभावी शेतीला पाणी देता येत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून याबाबत निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT