दौंड तालुक्यातील सर्व सरकारी यंत्रणांच्या नाकावर टिच्चून तालुक्यात रोज हजारो टन कचरा पुणे शहरातून आणून टाकला जातोय. हा प्रकार असाच चालू राहिल्यास लवकरच दौंड तालुका पुणे शहराचा कचरा डेपो म्हणून ओळखला जाऊ शकतो. पंचायत समिती, आरोग्य विभाग, महसूल यंत्रणा मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. भांडगाव, बोरीऐंदी, भरतगाव, जावजीबाची वाडी या परिसरात हा कचरा सर्रास टाकला जात आहे.
शेतकर्याची खतासाठी मागणी असल्याने कचरा टाकला जातोय, अशी पळवाट काढून रोज हजारो टन कचरा खाली केला जात आहे. शेतकर्यांची मागणी असेल तर शेतकर्यांच्या शेताच्या परिसरात कचरा टाकला जात नाही, तर आडबाजूची ठिकाणे कचरा विल्हेवाटीसाठी निवडली गेली आहेत. पुण्यातून कचरा घेऊन येणार्या गाड्यांच्या चालकांना कचरा कोणाला द्यायचा आहे, कोठे टाकायचा आहे, हे माहीत नसते. पहिली गाडी जेथे खाली झाली, तेथे आम्ही खाली करतो, अशी उत्तरे ते देत आहेत.
दौंड तालुका आरोग्याधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी आम्ही भांडगाव ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे, असे जुजबी उत्तर दिले; तर भांडगावचे सरपंच लक्ष्मण काटकर यांनी आम्ही आरोग्य विभागाला पत्र दिले आहे, असे सांगितले. या सर्व प्रकारावरून आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कोणीच या आरोग्याशी खेळ करणार्या प्रकाराबद्दल गंभीर नसल्याचे दिसले.
शनिवारी, रविवारी आणि इतर सरकारी सुटीच्या दिवशीच या कचर्याच्या गाड्या येत असतात. यातील बर्यापैकी वाहने भांडगाव येथे येत असून, भांडगाव येथे आलेल्या वाहनातील पुस्तिकेचा तपशील पाहता 13 ते 25 तारखेपर्यंत तिथे मोठ्या प्रमाणात कचरा खाली करण्यात आलेला आहे. भरतगाव आणि बोरीऐंदी या गावांतसुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या गावातील एजंटमार्फत या कचर्याचा फार मोठ साठा आता दौंड तालुक्यात होऊ लागला आहे.