केडगाव: दौंड तालुक्यातील खोरमधील रंजना केसकर या महिलेचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दरम्यान अति रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २५ एप्रिल) घडली असून या घटनेमुळे आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी खोर गावात केसकर कुटुंब यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्री किंवा आरोग्य मंत्री घेणार का असा सवाल केला आहे.
यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, रंजना केसकर यांचा बळी या राज्यांच्या आरोग्य विभागाने घेतला असून पुणे जिल्ह्यातील नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कदम नामक डॉक्टरला बोलवावे लागते आणि या शस्त्रक्रिया करण्यासाठी टार्गेट दिले जात असून या डॉक्टरने एका दिवसांत ९७ इतक्या विक्रमी शस्त्रक्रिया केल्या आहेत.
मेंढपाळ असणाऱ्या रंजना केसकर यांच्या शस्त्रक्रियेवेळी केसकर यांच्या शरीरात रक्तस्राव होत आहे, हे माहीत असूनही केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी डॉक्टर कदम यांनी शस्त्रक्रिया केली, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. रंजना केसकर यांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.