पुणे: भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार असून, त्यासाठी शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याच्या सूचना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून ऑनलाइन पद्धतीने शनिवारी (दि.2) झाले. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयातून दूरदृष्य प्रणालीद्वारे ते उपस्थित होते. या वेळी घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. (Latest Pune News)
कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय कृषी सह-संचालक दत्तात्रय गावसाने, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे उपस्थित होते.
या वेळी कृषिमंत्री भरणे यांनी कृषी विभागाची रचना, कृषी विद्यापीठे व त्याअंतर्गत विभाग, संशोधन केंद्रे, ममहाबीजफसह कृषी विभागाच्या अंतर्गत महामंडळे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, वेगवेगळे विभाग आदींची संक्षिप्त माहिती घेतली.
पीक विमा योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) आदी योजनांची माहिती त्यांनी उपस्थित अधिकार्यांकडून जाणून घेतली. विभागाने सर्व योजना प्रभावीपणे शेतकर्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात 1 हजार 930 कोटी जमा: कृषी आयुक्त
‘पीएम किसान’बाबत बैठकीत माहिती देताना कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, राज्यात ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचे नोंदणीकृत 1 कोटी 23 लाख 92 हजार लाभार्थी असून, 20 व्या हप्त्यासाठी 96 लाख 51 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे एकूण 1 हजार 930 कोटी 23 लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.
दरवर्षी तीन हप्त्यात एकूण 6 हजार रुपये जमा करण्यात येतात, असे त्यांनी सांगितले. मपीएम किसान सन्मान निधीफ योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील 4 लाख 51 हजार 850 शेतकर्यांच्या खात्यात आज 20 व्या हप्त्याचे 90 कोटी 37 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.