पुणे

फुरसुंगीतील विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास; बसला तुडुंब गर्दी

अमृता चौगुले

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीच्या बसला सध्या गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून, त्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. यामुळे पीएमपी प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी जादा बस सोडण्याची मागणी पालकांकडून होत आहे. गेल्या काही वर्षांत फुरसुंगी गावाची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. गावातून अनेक विद्यार्थी रोज शिक्षणासाठी हडपसर, पुणे येथे ये-जा करतात. बहुतांश विद्यार्थ्यांची शाळा सकाळच्या सत्रात असल्याने त्यांना शाळा, कॉलेजसाठी सकाळी लवकरच घरातून बाहेर पडून बसथांब्यावर बसची वाट पाहावी लागत आहे.

विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थ, चाकरमानी, व्यावसायिक हेसुध्दा या बसने प्रवास करतात. यामुळे दररोज सकाळी साडेसहाच्या सुमारास आलेल्या बसला गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांना या गर्दीतूनच वाट काढत बसमध्ये चढावे लागते व दाटीवाटीत प्रवास करावा लागतो. यामुळे पीएमपी प्रशासनाने सकाळच्या सुमारास गर्दी लक्षात घेता दोन बस सोडाव्यात; अन्यथा पालकांसह आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संदीप हरपळे यांनी दिला आहे.

तुडुंब भरलेल्या बसमध्ये दप्तराच्या ओझ्यासह कसेबसे उभे राहिलेल्या आमच्या मुला-मुलींचे हाल आम्हाला पाहवत नाहीत. बसमध्ये जागा मिळावी म्हणून त्यांना सहा वाजताच घर सोडावे लागत आहे. बसमध्ये चढताना चेंगराचेंगरी होते. त्यामुळे आमची मुले सुखरूप घरी येईपर्यंत आम्हाला काळजी वाटत असते.

                                                                    -जालिंदर काकडे,
                                                                    पालक, मांजरी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT