पुणे

पीएम किसान योजनेंतर्गत मिळालेले पैसे काढण्यासाठी टपाल कार्यालयात गर्दी

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत टपाल खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी वेल्हे तालुक्यातील टपाल कार्यालयात शेतकरी गर्दी करत आहेत. एकाच वेळी शेतकरी पैसे काढण्यासाठी गर्दी करत असल्याने टपाल कार्यालयात पैशांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे राजगड- तोरणागडाच्या डोंगर-दर्‍यातून येणार्‍या शेतकर्‍यांना गैरसोय सहन करावी लागत आहे. टपाल खात्याने गावातील कार्यालयात पुरेसे पैसे उपलब्ध करावेत, अशी मागणी वेल्हे तालुका भाजपचे अध्यक्ष आनंद देशमाने यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन सोमवारी (दि. 20) वेल्हे येथील विभागीय टपाल कार्यालयाला देण्यात आले आहे. तालुक्यातील विविध गावांतील टपाल कार्यालयात शेतकर्‍यांनी नव्याने खाते उघडले आहे. नुकताच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यात जमा झाला असल्याचा मेसेज आल्यावर शेतकरी टपाल कार्यालयात पैसे काढण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र, कार्यालयात ठरावीकच रक्कम असल्याने अनेक शेतकर्‍यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT