पुणे: राज्यातील 45 लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 च्या प्रभावी अमलबजावणीसाठी एमएसईबी सोलार ॲग््राो पॉवर लिमिटेडला नवी दिल्ली येथे स्कोच समूहाच्या वतीने राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले.
राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात एमएसईबी सोलार ॲग््राो पॉवर लिमिटेड अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 ची अंमलबजावणी सुरू आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही या योजनेला गती दिली. या दोघांच्या नेतृत्वात गत सव्वा वर्षांत 3300 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेतून कार्यान्वित झाले असून, त्याद्वारे राज्यातील 40 लाख एकर शेतजमिनीवर सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे.
देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध सार्वजनिक क्षेत्रातील योजना व संस्थांना दिला जाणारा स्कोच समूहाचा पुरस्कार हा राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र सन्मान आहे. पुरस्कारासाठी ऊर्जा वर्गवारीमध्ये मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 च्या कामगिरीचे विविध तज्ज्ञांकडून मूल्यमापन करण्यात आले. शेतकरी लाभार्थ्यांचे अभिप्राय घेण्यात आले.
यासह तज्ज्ञांच्या मतदानाद्वारे देशात प्रथम ठरलेल्या या योजनेला स्कोच सुवर्ण पुरस्कार जाहीर करण्यात आला. एमएसईबी सोलार ॲग््राो पॉवर लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्रीकांत जलतारे व अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जगातील सर्वात मोठ्या 16 हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 द्वारे 65 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 70 हजारांवर ग््राामीण रोजगारनिर्मिती सुरू आहे.
या योजनेमुळे महावितरणच्या वीज खरेदीमध्ये 10 हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये 13 हजार 500 कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने औद्योगिक व व्यावसायिक विजेचे दर स्वस्त होत जाणार आहेत. या योजनेत आतापर्यंत 3300 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले असून 8 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.