मांजरी (पुणे) : ‘पेसा’अंतर्गत १२,५०० पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्यासह सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची शनिवारी (दि. २९) यशस्वी सांगता झाली. मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा यशस्वी झाल्यानंतर शरद ठोकळ, राजाराम पाडवी, राहुल धनवे, निकिता मेचकर, श्वेता इश्वक, विजयकुमार बंबले यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले.
याशिवाय अनुदानित व शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करून त्रुटींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे का, याचा आढावा घेण्यासाठी तीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री पुन्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
* ४० पैकी १४ मागण्या मान्य
* आदिवासी वसतिगृहातील भोजनासाठी मेस सुविधा
* पं. दीनदयाल उपाध्याय स्वयंयोजना अकरावीपासून
* आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूंचा अभ्यास करून कालबद्ध कृती आराखडा राबवणार
* बोगस आदिवासी प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीवर रुजू झालेल्या व जात पडताळणी न केलेल्या कर्मचाऱ्यांची होणार बडतर्फी