वेल्हे: पानशेत आणि वरसगाव धरणक्षेत्रात बुधवारी (दि. 13) सकाळपासून ढगाळ वातावरण कायम असले तरी, तुरळक पावसाचा अपवाद वगळता पावसाने दिवसभर हुलकावणी दिली. पावसाअभावी धरणांमध्ये येणार्या पाण्याचा वेग मंदावला असून, खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा हळूहळू कमी होत आहे.
सायंकाळी 5 वाजता धरण साखळीतील एकूण पाणीसाठा 25.66 टीएमसी इतका असून, तो एकूण क्षमतेच्या 88.04 टक्के आहे. गेल्या 24 तासांत साठ्यात 0.04 टीएमसी घट झाली. मंगळवारी (दि. 12) याच वेळी पामीसाठा 25.70 टीएमसी होता. गेल्या 6 दिवसांपासून दररोज पाण्याची घट सुरू आहे, मात्र ती मोठ्या प्रमाणात नाही. (Latest Pune News)
रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावरील डोंगररांगांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणासह दाट धुके पसरले होते. पानशेत येथे दिवसभरात केवळ 1 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला, तर वरसगाव, टेमघर आणि खडकवासला परिसरात उघडीप होती.
सध्या पानशेत आणि वरसगाव धरणातून खडकवासला धरणात प्रत्येकी 600 क्युसेक पाणी सोडले जात असून, खडकवासला धरणातील पाणीपातळी स्थिर आहे.