पुणे: लैंगिक अत्याचार करून चिमुकलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणात चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्या चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या आहेत. त्या एखाद्या टणक धारदार हत्याराने केल्या असल्याची शक्यता आहे.
याखेरीज, गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून जात असताना सीसीटीव्हीत त्याच्या खांद्यावर बोचके असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. याबाबतचा तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलिस कोठडीत 12 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ केली आहे.
भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातील आरोपीच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला गुरुवारी (दि.7) विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील अरुंधती बह्मे म्हणाल्या की, चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर पळून जाताना सीसीटीव्हीमध्ये आरोपीच्या खांद्यावर बोचके असल्याचे दिसून येत आहे. त्या बोचक्यामध्ये काय आहे? ते कुठे लपवून ठेवले आहे. आरोपीच्या हातात खाऊचा पुडा दिसत आहे. हा खाऊ त्याने कुठल्या दुकानातून आणला आहे. त्या दुकानदाराकडे विचारणा करायची आहे.
या प्रकरणातील अजून काही महत्त्वाचे पुरावे आणि मुद्द्यांची पडताळणी बाकी असल्याने बह्मे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करावी, अशी मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
समाजात उसळलेली संतापाची लाट आणि सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी वकिलांनी आरोपीला कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यासंबंधीच्या मागणीचा अर्ज सकाळी न्यायालयात दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने कोणतीही हरकत न घेता पोलिसांच्या सोयीप्रमाणे त्याला हजर करण्याची परवानगी दिली. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले.
पुण्यात रविवारी ‘कँडल मार्च’
नसरापूरमध्ये घडलेल्या अमानवीय अत्याचार घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी (दि. 10 मे) पुण्यात ‘कँडल मार्च’चे आयोजन केले आहे. समस्त पुणेकर नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सायंकाळी 6 वाजता बालगंधर्व चौकातून सुरू होईल आणि डेक्कन येथील सावरकर स्मारक येथे त्याची सांगता होईल. सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन अश्विनी कुरपे, जयमाला इनामदार आणि शेफाली वैद्य यांनी केले आहे.