सासवड; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे राहणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शूरवीर जिवाजी महाले, शिवाजी काशीद आणि हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी ज्यांनी बलिदान केले अशा महापुरुषांचे चरित्र रेखाटले जाणार आहे, अशी माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली.
सासवड (ता. पुरंदर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांच्या 387 व्या जयंतीनिमित्त 'समाजभूषण' पुरस्काराचे वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. आ. जगताप म्हणाले की, प्रतापगडावरील रणसंग्रमात जिवाजी महाले यांनी अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचे हात कलम करून शिवरायांवरील हल्ला परतवून लावला. 'होते जिवा म्हणून वाचले शिवा' हा इतिहास आपण वाचला आहे.
नाभिक समाजातील तरुणांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर औद्योगिक संस्था स्थापन करून व्यवसायासाठी आवश्यक वस्तूंचे उत्पादन घ्यावे. उच्च शिक्षणासाठी तरुणांच्या कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करावे. या तरुणांना नोकरीची जबाबदारी माझी राहील. जेजुरीला सभागृह बांधण्यासाठी 25 लाख व सासवड येथे 15 लाखांचा निधी दिला जाईल, असे आ. जगताप यांनी सांगितले.
पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे म्हणाले की, कोरोना काळात आ. जगताप, आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून नाभिक समाजाला मदत करण्यात आली. या वेळी मुन्ना शिंदे, जिल्ह्याचे नेते अंकुश खडके, बेबीताई कर्हेकर, राजाभाऊ रायकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात मंत्रालयातील सचिव नितीन क्षीरसागर, पुणे महानगरपालिकेचे समान पाणीपुरवठा अधिकारी विनोद क्षीरसागर यांना 'समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच, विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे डॉ. तेजस्विनी इभाड, अॅड. परेश इभाड, डॉ. प्रशांत गायकवाड, संदीप राऊत, देवकर तलाठी, विनय राऊत, सोनाली इभाड, सचिन पवार, आनंद शिंदे, महादेव शिंदे, कलावंत अमर झेंडे व सासवड पालिकेचा देशात स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा युवक संघटनेचे अध्यक्ष भारत मोरे, भोर तालुकाध्यक्ष शिवाजी राऊत यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जेजुरी देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राऊत यांनी केले. सूत्रसंचालन महेश राऊत यांनी केेले. पुरंदर तालुकाध्यक्ष राहुल मगर यांनी आभार मानले.