चाकण; पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून लम्पी आजार नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असतानाच या आजाराने मृत्युमुखी पडणार्या गुरांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे. चाकण येथील माजी उपसरपंच अशोक बिरदवडे यांच्या गोर्ह्याचा आणि चिंचोशी गावातील प्रताप मधुकर सांगडे यांच्या जर्सी बैलाचा लम्पी रोगाने मृत्यू झाल्याची बाब मागील दोन दिवसांत समोर आली आहे. खेड तालुक्यात आतापर्यंत सुमारे 40 गुरांचा या आजाराने बळी घेतला आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये लम्पीचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी सध्या सक्रिय जनावरांची संख्या 564 एवढी आहे. आत्तापर्यंत 270 जनावरांचा यामध्ये मृत्यू झाला असून ही संख्या वाढतच आहे. एकूण बाधित जनावरांची संख्या ही 6 हजार 554 एवढी झाली आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने इतर जिल्ह्यातून येणार्या जनावरांची संख्यादेखील ग्रामीण भागात वाढली आहे. लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी सुटी न घेता काम करत आहेत. लम्पी आजार पूर्णपणे नियंत्रणात आणण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.