पुणे

पुणे : ‘सीटीईटी’चे उमेदवार ‘अभियोग्यता’ला मुकणार ; प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने अडचण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी राज्यात 22 फेब—ुवारी ते 3 मार्चदरम्यान ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी डी. एड. झालेल्या उमेदवारांना टीईटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या सीटीईटी परीक्षेचा निकाल येण्यास वेळ लागणार असल्यामुळे संबंधित विद्यार्थी अभियोग्यता चाचणीला मुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे.

त्याचवेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते; परंतु डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नव्हती. संबंधित परीक्षा आता होणार असल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे; परंतु परीक्षेच्या नियमावलीमुळे डी. एड. धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात नवाज पटेल,अंकुश राठोड, संदीप पवार, गणेश चौरे आदी उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर शिक्षक भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे.

परंतु सध्या सीटीईटी शेवटच्या टप्प्यात आहे व एका महिन्याच्या आत परीक्षेचा निकाल अपेक्षित आहे; परंतु अभियोग्यता चाचणीच्या नियमावलीमुळे आम्ही परीक्षेपासून वंचित होण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी अभियोग्यता परीक्षेसाठी निवेदन अर्ज सीटीईटी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर स्वीकारण्यात यावेत किंवा आम्ही सीटीईटी परीक्षेला बसलो आहे हे गृहीत धरूनआम्हाला अभियोग्यता परीक्षेला बसण्याची संधी द्यावी, अशी आमची मागणी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT