पुणे; पुढारी वृत्तसेवा : मोदी आणि आरएसएसचा पराभव करण्यासाठी दुबई, सौदीला गेलेले लोक आणि मृत व्यक्ती आणा आणि 26 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मतदान करून विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली हे करत असल्याचा व्हिडीओ भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी टि्वट केला आहे.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी पुण्यात अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उस्मान हिरोलीकर यांनी भाषण केले. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारास मत देण्याचे आवाहन करताना जियाउद्दीन बुखारी यांच्या वाक्याचा दाखला दिला.
ते म्हणाले, आमचे मरहुम जियाउद्दीन बुखारी सांगत असे की, "जे कोणी लोक दुबईला गेले आहेत, जे कोणी लोक सौदीला गेले आहेत, या सर्वांना मतदानासाठी हजर करा, जे कोणी मेलेले आहेत, त्यांनाही मतदानासाठी हजर करा आणि मतदान करून घ्या." त्यानुसार आपण येणार्या 26 तारखेला सर्वांनी पुढे येऊन नव्वद नव्हे शंभर टक्के मतदान केले पाहिजे. तरच मोदी आणि आरएसएस विरोधातील लढाई आपण जिंकू शकणार आहोत.