भामा आसखेड (ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : देशमुखवाडी ते खरमारवाडी जवळच्या ओढ्यावर 60 लाख रुपये खर्चून होत असलेल्या साकव पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाचा फायदा परिसरातील वस्त्या व शेतीसाठी होणार असल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भामा आसखेड धरण होण्यापूर्वी देशमुखवाडी ते अनावळे असा रस्ता होता. हाच रस्ता पुढे पाईटला जात होता. धरण झाल्याने तो जलाशयात गेल्याने अनेक गावांचा संपर्क गेल्या 25 वर्षांपासून तुटला आहे. देशमुखवाडी व खरमारवाडी जवळच्या ओढ्यावर साकव पूल झाल्याने पुलाचा फायदा भालसिंगवाडी, जाधववाडीतील नागरिकांसह येथील शेतकर्यांना होणार आहे.
दोन्ही वाडीच्या नागरिकांनी ओढ्यावर पूल व्हावा म्हणून माजी जि.प. सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्याकडे मागणी केली होती. मागणीनुसार बुट्टे पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून 60 लाखांचा निधी मिळविला. निधीची तरतूद होऊन प्रशासकीय मान्यता मिळताच कामाला सुरुवात झाली. सध्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे.
भामा आसखेड बुडीत क्षेत्राच्या परिसरातील शेतकर्यांना साकव पुलाचा मोठा उपयोग होणार आहे. पूल मोठा असल्याने निधी कमी पडत आहे. वाढीव निधीसाठी प्रयत्न करून पुलाचे काम मार्गी लावणार असल्याचे बुट्टे पाटील यांनी सांगितले. साकव पुलाची मागणी पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम सुरू झाल्याने नागरिक समाधानी आहेत. देशमुखवाडी – खरमारवाडी ते अनावळे पूर्वीचा रस्ता सुरू होण्यासाठी धरण जलाशयांतर्गत पूल व्हावा अशी नवीन मागणी नागरिकांची आहे.