मंचर: बेल्हा-जेजुरी महामार्गावरील लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. नवीन पुलाचे काम चार वर्षांपासून अर्धवट आहे. हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट राहिलेले पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
लाखणगाव येथून बेल्हा-जेजुरी महामार्ग जातो. महामार्ग सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. लाखनगाव येथे घोड नदीवर 10 कोटी रुपयांचा नवीन पूल मंजूर झाला आहे. पुलाचे काम अर्धवट झाले आहे. त्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक होत असते.(Latest Pune News)
जुना पूल कमी उंचीचा व रुंदीचा आहे. एका बाजूला रस्त्याला वळण आहे. त्यामुळे अपघात होत असतात. यापूर्वीही जुन्या पुलावर अनेकदा अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली होती. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जुन्या पुलावरून पाणी जाते.
त्यामुळे दुचाकीचालक व इतर वाहनचालकांना धोकादायकरीत्या पुलावरून ये-जा करावी लागते. रात्रीच्या वेळी पुलावरून पाणी गेले व पाण्याचा अंदाज न आल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे, असे माजी सरपंच दस्तगीर मुजावर यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बंद असलेले पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुलाच्या क्षमतेच्या तुलनेत पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. ट्रक, हायवा, वाळू वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर सतत या पुलावरून ये-जा करीत असतात. पावसाळ्यात घोडनदीला पूर आल्यास अनेकदा पुराचे पाणी पुलावरून जाते. पुलाच्या आजूबाजूचा मातीचा भराव काही प्रमाणात वाहून गेला आहे. त्यामुळे जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.- सतीश रोडे पाटील, अध्यक्ष, आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्था