पुणे; पुढारी वृत्तसेवा : ब्राह्मण समाजाने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी किमान 30 जागा ब्राह्मण समाजाला द्याव्यात, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाने भारतीय जनता पार्टीकडे केली आहे, अशी माहिती बहुभाषी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि भालचंद्र कुलकर्णी यांनी आज (दि.७) पत्रकार परिषदेत दिली.
कुलकर्णी म्हणाले की, चिंचवड, कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुलुंड या विधानसभा मतदारसंघांत ब्राह्मण समाजाची मतदार संख्या निर्णायक आहे. या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिल्यास, भाजपला विजय मिळवणे सोपे होईल. याच आशयाचे निवेदन भाजपाचे मित्र पक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना दिले आहे. चिंचवड मतदारसंघात बहुजन समाजातील इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे कोणालाही उमेदवारी दिली, तरी बंडखोरी अटळ आहे. त्यामुळे मतांची विभागणी होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण उमेदवाराला संधी दिल्यास, या मतदारसंघात विजय मिळवणे सहज शक्य होईल.
राज्यातील 45 विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यापैकी किमान 30 जागांवर ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळावी, अशी मागणी आहे. पुण्यातील कोथरूड, कसबा तसेच पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण-डोंबिवली या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार उपलब्ध आहेत. महाराष्ट्रीयन ब्राह्मण तसेच बहुभाषक ब्राह्मण मिळून अनेक मतदारसंघांमध्ये 80 हजारांहून अधिक मतदार आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न झाले आहेत, ज्यात ब्राह्मण समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. या परिस्थितीत ब्राह्मण समाजाला राजकीय भूमिका घेणे अनिवार्य झाले असल्याचे साखवळकर यांनी यावेळी सांगितले.