पुणे : महसूल आणि वन विभागाने आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केलेल्या तालुक्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व विद्यार्थ्यांना दुष्काळसदृश्य परिस्थितीत लागू असलेली अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे, सर्व महाविद्यालयांची परीक्षा शुल्क माफीची सवलत लागू करण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना, अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांसाठी परीक्षा शुल्कमाफीची योजना राबवण्यात येते. सन २०२५मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीग्रस्त तालुके घोषित करून या तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती महसूल व वन विभागाने लागू केल्या आहेत. त्यानुसार या सवलती उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व विद्यार्थ्यांना लागू करण्याचे प्रस्तावित होते.
या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने घोषित केलेल्या तालुक्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व विद्यार्थ्यांना दुष्काळसदृश्य परिस्थितीत लागू असलेली अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे, सर्व महाविद्यालयांची परीक्षा शुल्कमाफीची सवलत लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी लागू राहील. त्यासाठी आवश्यकतेनुसार वित्तीय तरतूद उपलब्ध करण्याची कार्यवाही उच्च शिक्षण संचालकांनी करावी, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.