सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : गायी, म्हशीच्या दूध दरात घट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे गोठा मालकांनी तर जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत दावणी रिकाम्या करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात दुभत्या जनावरांच्या किंमतीही 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. दूध दर उतरल्याने शेतकर्यांना जनावरे सांभाळण्याराठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो. मात्र, चार्याअभावी आणि दुधाचे घसरलेले दर यामुळे बळीराजाला नुकसान सहन करत जनावरांचे पालन-पोषण करावे लागत आहे. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा पशुपालन व्यवसाय निवडला जातो.
त्यामुळे शेतकर्यांच्या दारासमोर हमखास दोन-चार जनावरांची दावण असते. तरुणवर्गही दूध व्यवसायाकडे आकर्षित झाल्यामुळे तालुक्यातील अनेक गावागावात जनावरांचे गोठे तयार झाले होते. मात्र, दुधाचे दर उतरल्याने उत्पादन आणि खर्चात प्रचंड तफावत निर्माण झाली. त्यामुळे दूध उत्पादकांनी जनावरांना बाजारचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे. लोणंद, बारामती, काष्टी, राशीन येथील बाजारात जनावरांच्या किमती कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
यापूर्वी गायीच्या दुधाला गुणवत्तेनुसार 22 ते 30 – 32 रुपये दर मिळत होता. सध्या 20 ते 25 रुपये प्रतिलिटरला दर मिळत आहे. त्यामुळे गायीच्या दूध दरात आठ ते नऊ रुपयांची घसरण झाली आहे. म्हशीच्या दूध दराला यापूर्वी गुणवत्तेनुसार सरासरी 35 ते 45 रुपये दर मिळत होता. पण, म्हशीच्या दूध दरातही आठ ते दहा रुपयांनी घसरण झाली असून सध्या 25 ते 35 रुपयापर्यंत दर मिळत आहे. दुधाचे दर घसरले असले तरीही जनावरांच्या खाद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. गोळीपेंड 1520 रुपयांना मिळत आहे. कडब्याचे दरही तीन हजार रुपयांवर गेले आहेत. भुसाही महागला आहे.
हेही वाचा