भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भोर-पुणे मार्गावरील भोर ते कापूरव्होळपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. या रस्त्यावर जागोजागी मातीमुळे चिखल तयार झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना अपघात होऊ लागले आहेत, तर ठेकेदाराने सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्यामुळेदेखील अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. तरी वाहनचालकांनी वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
सुमारे 360 कोटी रुपये खर्चून कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी-वाई-सुरूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मागील महिन्यापासून कापूरव्होळपासून या कामास सुरुवात झाली असून, रस्त्याच्या कडेची झाडे तोडण्यात आली आहेत. सध्या 8 ठिकाणी रस्त्याच्या ठरावीक अंतरावर मोर्या टाकण्याचे काम चालू आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यायी आणि एकेरी वाहतूक सुरू आहे. परंतु, तेथे कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत. पावसामुळे पर्यायी मार्गावरही चिखल, राडारोडा पडलेला आहे.
फुटभर खोल चिखलमातीत वाहने रुतण्याचे प्रकार घडत आहेत. कासुर्डी ते कापूरव्होळ यादरम्यान कामे सुरू असलेल्या ठिकाणी मोठी दलदल झालेली आहे. कासुर्डीत अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या भोर-पुणे मार्गावर सर्वाधिक वाहने प्रवास करीत आहेत. रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनांचेही किरकोळ अपघात झालेले आहेत.
पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे फलक आणि वाहने गटारात जाऊ नये, यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. या ठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न वाहनचालक आणि स्थानिक नागरिक करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वागज, शाखा अभियंता योगेश मेटेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित ठेकेदारास उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.
हेही वाचा