भीमाशंकर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मागील 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास आराखड्यातील कामांवर स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नियोजनातील त्रुटी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष तसेच कंत्राटदाराच्या मनमानीमुळे कामे संथगतीने सुरू असून, दर्जाकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील सभामंडपाचे काम कमी कालावधीत पूर्ण करून त्याची गिनीज बुकमध्ये नोंद होणार असल्याचा दावा प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आला होता. यासाठी शासन स्तरावर वारंवार बैठका घेण्यात आल्या. मात्र, संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे ही संधी गमावल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
भाविकांना पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर 31 मे रोजी खुले करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, सध्या पायरी मार्ग आणि सभामंडपाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचा आरोप होत आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभाग आणि संबंधित ठेकेदारांकडून प्रत्यक्ष देखरेख केली जात नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
ठेकेदाराचा सुपरवायझर दररोज कामांचे जिओ-टॅग फोटो काढून वरिष्ठांकडे पाठवत असून, संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी न करता कामांवर लक्ष असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, भीमाशंकर परिसर मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत 31 मेपर्यंत मंदिर सुरू करण्याचे आदेश असताना मंदिर परिसर आणि पायरी मार्गावर मोठ्या प्रमाणात राडारोडा तसेच अपूर्ण कामे शिल्लक आहेत. पुढील महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास पायरी मार्गावरील माती आणि राडारोडा मंदिर परिसरात वाहून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच, उत्खननामुळे माळीण दुर्घटनेप्रमाणे परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही ग््राामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विकास आराखड्यातील कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशी मागणी भाविक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.