शिवनगर: बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील धुमाळवाडी, पवईमाळ तथा पणदरे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यासह गारपिटीने झालेले प्रचंड नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी, या मागणीसाठी माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांनी थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी फोनवर संवाद साधला.
यावेळी भरणे यांनी देखील उपस्थित असलेल्या कृषी तथा मंडल अधिकारी यांना ताबडतोब पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे निर्देश देऊन जास्तीची मदत करण्याचे आश्वासन दिले.
योगेश जगताप यांनी बुधवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीने झालेल्या पणदरे पंचक्रोशीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप बांदल, कारखान्याचे माजी संचालक अनिल तावरे, उदयसिंह धुमाळ, ॲड. रवींद्र माने, सरपंच बाळासाहेब कोकरे, अतुल जगताप, संदीप जगताप, रोहन जगताप, कृषी अधिकारी सचिन हाके, मनीषा यादव, अप्पासाहेब झंजे, शिवप्रसाद जाधव आदी उपस्थित होते.
दै. ‘पुढारी’च्या बातमीची चर्चा
यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी योगेश जगताप यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक करून संकटाच्या काळात मदतीला धावून येणारा नेता असल्याची भावना व्यक्त केली, तर यावेळी ‘अजितदादांनंतर नेत्यांना ग्राऊंड लेव्हलवरच झुंजावे लागणार’ या दै. ‘पुढारी’मधील नेत्यांविषयी असलेल्या बातमीची चर्चा झाली.
बळीराजावर आलेले हे संकट मोठे आहे. पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडून आणि संबंधित विभागाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. नुकसानीच्या या काळात एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.-योगेश जगताप, संचालक, माळेगाव साखर कारखाना