पुढारी ऑनलाईन डेस्क : बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज खून खटल्यात ऐतिहासिक निकाल देत ४ सख्खे भाऊ, ३ महिलांसह १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
दौंड येथील विनोद नरवार यांची ३ मे २०१८ रोजी हत्या झाली होती. विनोद नरवाल त्यांच्या दुचाकीवरुन निघाले असताना अनोळखी लोकांनी तलवार, कोयता, लोखंडी पाईप, काठ्या, फरशीचे तुकडे, दगडांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी व विनोद यांच्या पत्नी मीना नरवाल यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रूग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दौड पोलिसांत १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती एस.आर. पाटील यांच्या समोर हा खटला चालला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. ८ साक्षीदारांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पुरावे व न्यायवैदयकीय पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने १२ जणांना जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या दंडाची ५ लाखांची रक्कम मीना नरवाल यांना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.