जेजुरी (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : लोकांनी सरळ वागावे, समाजातील नियम पाळावेत व देशभक्ती जोपासावी, या जनजागृतीसाठी फुरसुंगी येथील बापूराव उर्फ श्रीपतराव गुंड यांनी गेली पंचेचाळीस वर्षे आळंदी ते पंढरपूर या महामार्गावर उलट चालत वारीची परंपरा चालू ठेवली आहे. हवेली तालुक्यातील बापूराव गुंड यांनी जनजागृतीची वारी सुरू केली आहे.
लोकांनी सरळ वागावे, सरळ चालावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, पर्यावरणाचा र्हास थांबवावा, झाडे लावून ती जगवावीत, स्वच्छता पाळावी, आरोग्य पाळावे, बेटी बचाओ बेटी पढाओ, नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, गुरुजन व जेष्ठांचा आदर करावा, माणुसकीचा धर्म पाळून मानवतेची सेवा करावी, देवाच्या भक्तीबरोबरच देशभक्तीही जोपासावी या विचारांची जनजागृती करण्यासाठी बापूराव गुंड पंचेचाळीस वर्षे आळंदी ते पंढरपूर प्रवास करीत आहेत. जनजागृतीची वाक्ये अंगावर लावून ही यात्रा ते करीत आहेत. जेजुरी येथे बोलताना गुंड यांनी आपण यापूर्वी जनजागृतीसाठी पुणे ते दिल्ली उलट चालत प्रवास केला असल्याचे सांगितले.