जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे बोरी (ता. इंदापूर) परिसरातील द्राक्षबागांवर विपरीत परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे मणी फुटू (क्राकिंग) लागले आहेत. तसेच फ्लॉवरिंग अवस्थेत असलेल्या बागांमधील मणीगळ, बुरी व डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बोरी गावमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा आहेत. सर्व बागांची छाटणी पूर्ण झाली असून, ऑगस्ट महिन्यात हंगामपूर्व छाटणी केलेल्या बागा परिपक्व झाल्या आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे सुमारे 250 एकर द्राक्षबागांना फटका बसला आहे. द्राक्ष मणी मोठ्या प्रमाणात फुटत असून, बागांचे जवळपास 50 टक्के नुकसान झाले आहे. घडातील मणी गळती होत आहे.
संबंधित बातम्या :
त्यातच आता ढगाळ वातावरण व धुके पडत असल्याने बुरी व डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डाऊनीग्रस्त सर्व घड काढून टाकावे लागत आहेत. त्यामुळे वारंवार कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. परिणामी, उत्पादन खर्च वाढला आहे. शासनस्तरावर त्वरित दखल घेऊन नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे.