पुणे: आयुष्मान भारतअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शालेय आरोग्य व सशक्तीकरण कार्यक्रमासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे चारदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, नोंदणी केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक सत्राला वेळेच्या १५ मिनिटे आधी ऑनलाइन उपस्थित राहण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी दिले आहेत.
प्रशिक्षण साहित्य किटचे वाटप
आयुष्मान भारत उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने शालेय आरोग्य कार्यक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्रात ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहिल्यानगर, रायगड, परभणी, लातूर आणि वर्धा या ११ जिल्ह्यांतील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि शासकीय अनुदानित शाळांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे.
या कार्यक्रमासाठी संबंधित प्रत्येक शाळेतील एक मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक आणि एक महिला शिक्षिका, अशा तीन जणांची 'आरोग्यवर्धिनी दूत' अर्थात म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी ११ जिल्ह्यांतील १३ हजार ३५५ शाळांमधील ४० हजार ६५ प्रशिक्षणार्थींसाठी प्रशिक्षण साहित्य किटचे वाटप करण्यात आले आहे.
नोंदणीची प्रक्रिया यापूर्वी पूर्ण करण्यात आली असून, बहुतांश शाळांनी संगणकीय प्रणालीवर नोंदणी केली आहे. आता नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी स्वतंत्र पोर्टल https://scertmaha.ac.in/shp हे विकसित करण्यात आले असून, प्रशिक्षणाचे वेळापत्रकही संबंधित शाळांना देण्यात आले आहे. राज्यस्तरीय आरोग्य व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षणाच्या विविध सत्रांना उपस्थित राहणार आहेत.
प्रशिक्षणात १०० टक्के उपस्थिती सुनिश्चित करावी
दरम्यान, संबंधित जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांमधील मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांची प्रशिक्षणातील १०० टक्के उपस्थिती सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित करण्याची जबाबदारीही शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.