पुणे : पुढारी वृत्तसेवा : विविध कारणांसाठी लागणार्या दाखल्यांसाठी एरवी गजबजणार्या पुणे स्टेशन परिसरातील महा- ई- सेवा केंद्रांतही शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने शुक्रवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. केंद्रात कंत्राटी तत्त्वावर असलेले कर्मचारी आलेले अर्ज स्वीकारत होते. तर, एरवी दाखले वितरित केल्या जाणार्या काऊंटरवर कोणीच नसल्याचे चित्र होते. पुणे शहरात सुमारे 250, तर ग्रामीण भागात एक हजार 435 महा-ई-सेवा केंद्र आहेत. प्रत्येक तालुक्यात एक अशी 14 सेतू केंद्र कार्यरत आहेत. सध्या आरटीई प्रवेशासाठी उत्पन्न आणि रहिवासी दाखला आवश्यक आहे.
याखेरीज, जात पडताळणी दाखले-प्रमाणपत्र, वैद्यकीय सुविधांसाठी उत्पन्न दाखले मिळविण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. तर, आरटीई प्रवेशासाठी मुदत वाढविल्याने काही जण नव्याने अर्ज दाखल करत होते. मात्र, कर्मचार्यांचा संप सुरू असल्याने दाखल झालेल्या अर्जांतील कागदपत्रांची पडताळणीसाठी अधिकारी नसल्याने दाखले मिळण्यास विलंब होईल, असे मानूनच नागरिक अर्ज देताना दिसून आले.
मुलाच्या आरटीई प्रवेशासाठी उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज केला आहे. संप सुरू असल्याने ज्या दाखल्यास 15 दिवस लागतात तो आता कधी मिळणार याची शाश्वती नाही. मुलाच्या शिक्षणाची संधी हिरावली जाऊ नये यासाठी अर्ज जमा केला आहे. लवकरच संप मिटेल, अशी अपेक्षा आहे.
– छाया गायकवाड.फनागरिकत्वाच्या प्रमाणपत्रासाठी आलो होतो. मात्र, संप असल्याने दाखला कधी मिळणार हेच कर्मचार्यांकडून सांगण्यात येत नाही. नुसता अर्ज देऊन संप मिटण्याची वाट बघून दाखला मिळण्याची अपेक्षा करण्यात काहीच रस नाही. सध्या फक्त अर्ज स्वीकृती सुरू आहे. जेव्हा सर्व काही सुरळीत होईल तेव्हा परत येऊन अर्ज जमा करणार आहे.
– अक्षय विटकर