सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चौधरवाडी (ता. बारामती) परिसरातील जवळपास 15 बोअरवेल ओव्हरफ्लो झाले असून बोअरवेलमधून आपोआप पाणी बाहेर पडू लागले आहे. शेतकरी भानुदास भापकर, मधुकर पवार, बाळासो सावंत, राजकुमार शिंदे यांच्या शेतातील बोअरवेलमधून गेल्या दोन दिवसांपासून पाण्याचे उंचच्या उंच फवारे उडत आहेत.
चौधरवाडी येथील जवळपास सर्वच शेतकर्यांनी विहिरी आणि बोअरवेलच्या माध्यमातून शेतीला पाणी उपलब्ध केले आहे. जिरायती भाग असल्याने या परिसरात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते; उन्हाळ्यामध्ये ही बोअरवेल पूर्णपणे कोरडी ठणठणीत पडते, पण मागील काही दिवसांमध्ये होत असलेल्या पावसामुळे बोअरवेलमधून पाण्याचे फवारे उडत आहेत.