पुणे

ऐन कार्तिकीत आळंदी बंदची हाक

अमृता चौगुले

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तपदी नुकतीच तीन विश्वस्तांची नेमणूक जिल्हा न्यायाधीशांनी जाहीर केली. तत्कालीन तीन विश्वस्तांच्या शिफारशीमुळे नवीन तीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली आहे. यात आळंदीतील स्थानिकांना डावलण्यात आल्याने आळंदी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रक्रियेचा निषेध म्हणून मंगळवारी (दि. 5) आळंदी बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, याच दिवशी कार्तिकी यात्रेची सुरुवात होत आहे. समस्त आळंदीकर ग्रामस्थांची रविवारी (दि. 3) ज्ञानदर्शन धर्मशाळेत बैठक झाली. देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची निवड करण्यात यावी यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

तरीदेखील प्रशासनाने स्थानिकांचा विचार न करता आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशीवर नवीन तीन विश्वस्तांची नेमणूक केली तसेच तत्कालीन विश्वस्तांनासुद्धा मार्च महिन्यापर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. याचा समस्त आळंदीकर ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास कार्तिकी वारीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.

या वेळी आळंदी ग्रामस्थांमध्ये माजी नगराध्यक्ष बबनराव कुर्‍हाडे पाटील, माजी विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले, चैतन्य महाराज लोंढे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, राहुल चिताळकर, रमेश गोगावले, नंदकुमार कुर्‍हाडे, रामदास भोसले, अशोक रंधवे, आनंदराव मुंगसे, शंकर कुर्‍हाडे, अशोक उमरगेकर, संजय घुंडरे, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, शिरीषकुमार कारेकर, राहुल चव्हाण, सुरेश घुंडरे तसेच आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT