पुणे: पुण्यात होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाच कोटींचा निधी देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या ९९ नांदी साहित्य संमेलनांसाठी पाच कोटी, परदेशात होणाऱ्या १२ संमेलनांसाठी सीएसआरच्या माध्यमातून दोन कोटी, विद्यापीठांमध्ये होणाऱ्या १३ विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे राज्यातील तेरा विद्यापीठांना मिळून चार कोटी रुपये आणि इतर उपक्रमांसाठी काही निधी असा एकूण १८ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केली.
शंभराव्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात उदय सामंत यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, संमेलनाची संयोजक संस्था असलेल्या समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मराठी भाषा विभागाचे सचिव श्यामकांत देवरे, परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन उपस्थित होते. परिषदेची वास्तू अद्ययावत करण्यासाठी एक कोटी रुपयांचा धनादेशही सामंत यांनी मसापच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
सामंत म्हणाले, मराठी भाषेची परंपरा आणि संस्कृती पुढच्या पिढीने जतन केली पाहिजे, या इच्छेने मराठी भाषा विभाग साहित्य परिषदेच्या मागे ठामपणे उभा आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाचा केवळ गाजावाजा किंवा इव्हेंट न करता मराठी भाषा सर्वत्र रुजणे, या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. मराठी भाषेच्या निमित्ताने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेतही बैठक घेतली जाईल.
शंभरावे संमेलन असल्याने वाढीव निधी
साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून दिला जाणारा नियमित निधी सध्या दोन कोटी रुपये आहे. दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी विशेष बाब म्हणून नियमित निधीव्यतिरिक्त एक कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी असा एकूण तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, तर सातारा येथे ९९ वे साहित्य संमेलनासाठीही तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.
पुण्यात होणारे शंभरावे साहित्य संमेलन ऐतिहासिक आणि विशेष असल्याने या संमेलनासाठी राज्य सरकारकडून पाच कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केवळ शंभराव्या साहित्य संमेलनासाठी घेण्यात आला आहे, तर पुढील साहित्य संमेलनापासून नियमाप्रमाणे दोन कोटी रुपयांचाच निधी दिला जाईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.