पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही, तेच इकडे आले आहेत. मुळात अजित पवार भाजपामध्ये आले नाहीत, तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला आहे. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून कोणतीही क्लीन चीट देण्यात आलेली नाही. त्याबाबत चौकशी सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश महासचिव व आमदार श्रीकांत भारतीय यांनी मंगळवारी (दि. 4) केले.
पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात श्रीकांत भारतीय हे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, अजित पवार यांनी राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा राज्यातील जनतेच्या हितासाठीच घेतला आहे. याआधी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे देखील सर्वसामान्य माणसाचे हित हेच ध्येय होते, असेही भारतीय यांनी नमूद केले. या प्रसंगी नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, राजेश पिल्ले तसेच क्षितिज गायकवाड आदी उपस्थित होते.
ट्रिपल इंजिन सरकार सशक्त
राज्यातील सरकार यापूर्वी डबल इंजिन होते. आता ते ट्रिपल इंजिन झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत सर्वाधिक सशक्त आणि दमदार सरकार हे आहे. अजित पवार यांच्यासोबत आलेले आमदार अपात्र ठरतील की नाही, याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. हे सरकार 2024 पर्यंत टिकेल, याची मला पूर्ण खात्री आहे, असेही श्रीकांत भारतीय यांनी स्पष्ट केले.