तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील पंपांवर भेसळयुक्त पेट्रोल, डिझेल राजरोसपणे विक्री होते. यामुळे ग्राहकांच्या वाहनांमध्ये बिघाड झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. यावर संबंधित अधिकार्यांचे नियंत्रण ठेवण्याची गरज असताना ते होत नसल्याचे वास्तव आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा ग्राहकांना देणे हे काही पेट्रोल पंप चालक करतात. मात्र अलीकडच्या काळात पेट्रोल टाकी किंवा डिझेल टाकीमध्ये पाणी निघण्याचे प्रमाण वाढले आहेत.
यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल, डिझेल भरताना काटा मारण्याची वेगळी पध्दत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसून गाडीत दिलेल्या पैशांमध्ये पूर्ण इंधन मिळत नाही. परिणामी गाडी एव्हरेज देत नाही. या समस्यांनी ग्राहक त्रस्त झाले आहेत. या प्रकारावर संबंधित अधिकारी नियंत्रण ठेवत नाही. वाढती महागाई आणि त्यामध्ये पेट्रोल पंपांवर ग्राहकांना दिलेल्या पैशाप्रमाणे दर्जेदार इंधन मिळत नाही. भेसळयुक्त इंधनाने वाहनांची दुरुस्ती देखभाल खर्च वाढत चालला आहे.
या प्रकाराला आळा घातला पाहिजे, अशी भावना ग्राहकांची आहे. दुसरीकडे पेट्रोल पंप चालक यांच्याकडील इंधन साठवलेल्या लोखंडी टाकीत बाष्प तयार होऊन पाणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही पेट्रोल पंप चालक डेडस्टॉक जास्त ठेवून ग्राहकांची काळजी घेतात. ठरावीक पेट्रोल पंपांवरच इंधन दर्जेदार मिळत आहे. भेसळयुक्त पेट्रोल पंप चालकांवर कारवाई झालेली एकही घटना घडली नाही.
ग्राहकांना माहित नाहीत अधिकार
ग्राहकांना आपले अधिकार माहीत नसल्याचा गैरफायदा पंप चालक सोयीस्कर घेतात. ज्या सुविधांसाठी आपण तिथे पैसे देतो त्या सुविधा खरेतर आपल्याला मोफत उपलब्ध करवून देणे हे पेट्रोल पंपचालकाची जबाबदारी असते. मात्र याची माहितीच नसल्याने ग्राहक लुटले जात आहेत.