पुणे

बारामती : देशात सत्तेचा गैरवापर : खा. शरद पवार यांचे टीकास्त्र

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अधिवेशनात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. परंतु विरोधकांना बोलूच द्यायचं नाही, अशी केंद्राची भूमिका आहे. आजपर्यंत असे चित्र कधी पाहिले नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

खा. पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठी सरकार काम करत आहे. न्यायालयाने अनिल देशमुख, संजय राऊत यांना जामिन दिला. त्यातून राज्यातील सत्ताधा-यांनी काही तरी शिकलं पाहिजे, सत्तेचा गैरवापर केला जात आहे. काही सदस्य आतमध्ये आहेत. त्यांनाही न्याय मिळेल. जामिन मिळणे हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले होते, त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम करण्यात आल्याचे दिसत असल्याचे ते म्हणाले.

न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारचा दृष्टीकोन चुकीचा असल्याचे दिसून आले आहे. सत्ताधाऱयांनी यातून काही शिकले पाहिजे अशी टीका पवार यांनी केली. केंद्राचे १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. त्यात सरकारची निती काय हे दिसून येईल. देशाचा विचार करून संसदेची गरीमा लक्षात घेवून सरकारने पावले टाकावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी ज्या दिवशी यशस्वी होईल, त्या दिवशी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चांगले दिवस येतील असेही ते म्हणाले. सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे आणि भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून पुढे यायला पाहिजे, राजकीय मतभेद बाजूला सारून अर्थव्यवस्थेच्या मजबूतीसाठी काम करण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT