मुख्याध्यापक पदासाठीच्या संचमान्यता निकषात बदल pudhari
पुणे

मुख्याध्यापक पदासाठी शाळेत शंभर विद्यार्थी असणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

राज्यातील पहिली ते पाचवी, पहिली ते दहावी, आठवी ते दहावी, आठवी ते बारावीच्या शाळेतील मुख्याध्यापक पदासाठीच्या संचमान्यता निकषात बदल करण्यात आला आहे. आता नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी शाळेत शंभर विद्यार्थी असणे आवश्यक असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.

पदनिश्चितीच्या प्रचलित धोरणामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्यासाठी राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निश्चित करण्याबाबतचा निर्णय 15 मार्च 2024 रोजी घेतला होता. त्यात मुख्याध्यापक पदासाठी 150 विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आली होती.

परंतु, या निर्णयाला राज्यभरातून विरोध करण्यात आला. त्यानंतर त्यात आता सुधारणा करून मुख्याध्यापक पदासाठी शाळेत शंभर विद्यार्थी असणे आवश्यक, तर पूर्वीच्या मंजूर पदांना संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या 90 असणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना संबंधित व्यवस्थापनाच्या अन्य शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे, समायोजनानंतरही त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास संबंधित मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे, मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्त किंवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर संबंधित शाळेला सुधारित निकषांनुसार पटसंख्येअभावी मुख्याध्यापकाचे पद लागू होत नसल्यास ते पद रद्द करावे, असे नमूद केले आहे. तसेच, 15 मार्च 2024 नुसार संचमान्यता केल्यानंतर मान्य होणारी खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांच्या मर्यादेत मंजूर करण्यात येतील. पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणार्‍या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल. हा बदल वगळता उर्वरित निकष, आदेश लागू राहतील, असे स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT