खेड: मांजरेवाडी (धर्म, ता. खेड) येथे महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात शनिवारी (दि. 12) दुपारी मिळून आला होता. या गंभीर घटनेबाबत आरोपी नवनाथ मांजरे (वय 29) या नराधमाला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 9 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल राजे यांनी दिली.
पीडित अल्पवयीन मुलगी एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. इयत्ता 11 ची परीक्षा देऊन क्लाससाठी ती महाविद्यालयात नेहमीप्रमाणे येत होती. शुक्रवारी (दि. 11) राजगुरुनगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रोड येथे थांबली असताना आरोपी नवनाथ मांजरे तिथे आला. घरी यायचे का? असे विचारून पीडितेला दुचाकीवर बसविले.
दरम्यान मला उसाच्या शेताला दोन पाण्याची बारी द्यायची आहेत, असे सांगून मुलीला मांजरेवाडी पिंपळ-मलघेवाडी या रस्त्याने त्याच्या नदीकाठच्या उसाच्या शेतात नेले. आरोपीने पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने पीडित मुलीच्या डोक्यात शेतातील दगड उचलून मारला. तिचा मृतदेह शेतालगतच असणार्या भीमा नदीच्या पात्रात 150 फूट ओढत नेऊन टाकला, अशी कबुली आरोपीने दिली असल्याचे सहायक निरीक्षक स्नेहल राजे यांनी सांगितले.
बहिणीचा साखरपुडा तिने पाहिलाच नाही
पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा रविवारी (दि. 13) गावातच होणार होता. त्यामुळे सर्व कुटुंब तयारीत आणि आनंदात होते; मात्र आदल्या दिवशीच छोट्या बहिणीचा खून झाल्यामुळे हा कार्यक्रम रद्द झाला. दुर्दैवी आणि भयानक घटना समोर आल्याने कुटुंब पुरते हादरले. संपूर्ण गावाने हळहळत दुःख व्यक्त केले.
आरोपीला फाशी देण्याची मागणी
आरोपी गावामधीलच असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गाव ते स्मशानभूमीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या वेळी ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे केली.
घटनेनंतर आरोपी यात्रेला देखील गेला
घटना घडल्यानंतर आरोपी बिनदिक्कतपणे गावात हिंडत होता. घटनेनंतर तो जऊळके येथे यात्रेला जाऊन आला. दुसर्या दिवशी सकाळी हनुमान जयंतीनिमित्त स्वत:च्या किराणा दुकानात नारळ विकत होता. माझ्या शेतात नदीलगत कोणातरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला आहे. मी घाबरून तिकडे गेलो नाही, असे गावात सांगत होता.