रेल्वे प्रशासनाने आगाऊ आरक्षणाच्या नियमात बदल केला आहे. त्यासंदर्भातील अध्यादेश नुकताच रेल्वेकडून काढण्यात आला आहे. त्यानुसार प्रवाशांना तिकीटासाठी आगाऊ आरक्षण आता साठ दिवस म्हणजेच दोन महिनेअगोदर करावे लागणार आहे. पूर्वीचा 120 दिवसांचा म्हणजेच 4 महिन्यांचा कालावधी बंद करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे.
याबाबत मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत म्हणाले, रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सुविधेसाठी 120 दिवसांऐवजी, प्रवासाचा दिवस वगळता केवळ 60 दिवस आधीच आगाऊ आरक्षण केले जाणार आहे, याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. पॅसेंजर मार्केटिंगचे संचालक संजय मनोचा यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी 365 दिवसांची मर्यादा पूर्वीसारखीच राहील, असे पत्रात नमूद केले आहे.
रेल्वेने आरक्षणाचा कालावधी कमी केल्यामुळे प्रवाशांना तिकिटे उपलब्ध होणार असून, लांब पल्ल्याच्या आणि इतर गाड्यांचे वेटिंग कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना डायरेक्ट तिकीट उपलब्ध होणार आहे. तसेच, महत्त्वाचे म्हणजे तिकिटांचा होणारा काळाबाजार रोखला जाणार आहे. -हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
रेल्वे बुकिंगचा कालावधी कमी केल्यामुळे आम्हाला फायदा होणार आहे. आमच्यासोबत प्रवाशांनादेखील फायदा होणार आहे. यात आमचा वेळ वाचणार असून, प्रवाशांनादेखील जास्त वेटिंग करावी लागणार नाही.रोहित पासले, रेल्वे तिकीट बुकिंगतज्ज्ञ