Pune News: आपले सरकार सेवा तसेच सेतू केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे. या केंद्रांची तपासणी करून त्यांना येत असलेल्या अडचणी तसेच नागरिकांना मिळणार्या सेवांबाबत आढावा घेतला जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात 1 हजार 888 सेतू केंद्र आहेत. आतापर्यंत 298 केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित केंद्राची तपासणी 31 डिसेंबरपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली.
गावपातळीवर नागरिकांना सरकारी दाखले, सनद, निकाल, सुविधा सेतू केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. जिल्हा प्रशासनातर्फे सेंतू केंद्राच्या माध्यमातून 21 नोंदणीकृत सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. नागरिकांना त्यासाठी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते.
मात्र, याचे विकेंद्रीकरण करून या सेवा व सुविधा आपले सरकार व सेतू केंद्रांमार्फत गावपातळीवर देण्यात येत असतात. जिल्ह्यात 1 हजार 373 केंद्र कार्यरत आहेत. तर सुमारे सव्वादोनशे केंद्र बंद आहेत.
या केंद्रांमधून नागरिकांना देण्यात येणार्या सुविधांचा आढावा तसेच चालकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
याबाबत मापारी म्हणाले, सरकारच्या धोरणानुसार कामकाज होत आहे का, हे तपासले जात आहे. नसल्यास त्यांना येणार्या अडचणी सोडवून नागरिकांना सेवा तत्परतेने कशी मिळतील, यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. सेवा पुरविण्याबाबत या केंद्रचालकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. सध्या अनोंदणीकृत सेवा देण्याचे प्रमाण केवळ 60 टक्केच आहे. त्यातही वाढ करण्यासाठी या चालकांना सूचना देण्यात येणार आहेत.
याची करणार तपासणी
तपासणी करण्यासाठी एक अर्ज तयार करण्यात आला आहे. त्यात प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार हा अर्ज भरून घेतला जाणार आहे. यात केंद्र सुरू आहे का, असल्यास परवाना दिलेल्या पत्त्यावर ते सुरू आहे का, हे तपासले जाणार आहे. सुरू असल्यास त्याचा फोटो आता पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे.
केंद्र सुरू करण्याची व बंद करण्याची वेळ काय, सेवा केंद्राचा लोगो असलेला फलक, नागरिकांना देण्यात येणार्या सेवांच्या दरसुचीचा फलक, देण्यात येणार्या नोंदणीकृत सेवा, आकारले जाणारे शुल्क, त्याची पावती, अर्जांची स्थिती, प्रलंबितता, केंद्रातील आवश्यक सुविधा, इंटरनेट, सॉफ्टवेअर, लोकसेवा हक्क आयोगाचा फलक याचीही तपासणी केली जाणार आहे.
अधिकार्याविरोधात दादही मागा
सेतू केंद्रातून नागरिकाने एखाद्या सेवेसाठी किंवा सुविधेसाठी अर्ज केल्यानंतर ठरलेल्या मुदतीत सेवा न मिळाल्यास संबंधित सेवा देणार्या अधिकार्याविरोधात जिल्हाधिकार्यांकडे दाद मागता येते. त्यासाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, अशी दाद मागण्यासाठी सेतू केंद्रातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बहुतांश नागरिक तसेच केंद्रचालक याबाबत अनभिज्ञ आहेत. केवळ एका क्लिकवर संबंधित अधिकार्याविरोधात दाद मागता येते. त्यामुळे सर्व केंद्रचालकांना ही सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी निर्देश देण्यात येणार आहेत.