पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या 72 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. शिरूरमध्ये 49 टक्के आणि बारामती तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे 43 टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण होऊ शकलेली आहे. सोयाबीन पिकाच्या 193 टक्के क्षेत्रावरील म्हणजे सरासरी क्षेत्राच्या जवळपास दुप्पट क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, भाताच्या पुनर्लागवडी 80 टक्क्यांवर पोहचल्या आहेत.
मात्र, भुईमूग 37 टक्के, तूर 27 टक्के, मूग 32 टक्के आणि उडदाचा पेराही 50 टक्क्यांइतकाच झाल्याने या चारही पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही काचोळे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 1 लाख 95 हजार 710 हेक्टर असून, 4 ऑगस्टअखेर 1 लाख 40 हजार 888 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.
दरम्यान, खरीप हंगामातील पिकांच्या तालुकानिहाय झालेल्या पेरणीचे क्षेत्र आणि कंसात टक्केवारी नमूद केली आहे. हवेली 2597 (53), मुळशी 6709 (79), भोर 12147 (70), मावळ 11665 (90), वेल्हा 5247 (89), जुन्नर 22240 (75), खेड 26004 (111), आंबेगाव 13427 (84), शिरूर 16529 (49), बारामती 4679 (43), इंदापूर 6246 (74), दौंड 3223 (73), पुरंदर 10175 (53 टक्के).
सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र 20 हजार 982 हेक्टर असून, त्यापेक्षा अधिक म्हणजे 40 हजार 498 (193 टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. अन्य पिकांची झालेली पेरणी हेक्टरमध्ये व सरासरी क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष झालेली पेरणी कंसात टक्क्यांमध्ये नमूद केली आहे. भात 47416 (80 टक्के), बाजरी 18886 (40), रागी 1618 (58), मका 14852 (79), तूर 539 (27), मूग 4750 (32), उडद 856 (50 टक्के).
जिल्ह्यात खरीप हंगामातील भुईमूग पिकाचे सरासरी क्षेत्र 15 हजार 432 हेक्टर इतके आहे. त्यापैकी केवळ 32 टक्के म्हणजे 4 हजार 949 हेक्टरवरच पेरणी पूर्ण झालेली आहे. गतवर्षी हीच पेरणी 5 हजार 896 हेक्टर इतकी (37 टक्के) होती. याचा विचार करता यंदा खरिपातील भुईमुगाचा पेरा कमी झाला असून, क्षेत्रवाढीस मर्यादा येत असल्याचे चित्र आहे.