पुणे : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात आठ तालुक्यांतील शेतीमधील पिकांना फटका बसला आहे. त्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 560 हेक्टर क्षेत्रावरील फळबाग, भाजीपाला, गहू, बाजरी पिकांचा समावेश आहे. शासकीय कर्मचार्यांच्या संपामुळे पंचनामे झालेले नाहीत. सहा मार्चला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबेगाव, मावळ आणि मुळशी या तालुक्यांतील 39 गावांतील 229 शेतकर्यांच्या 81.50 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिके, फळपिकांचे नुकसान झाले आहे.
या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच 16 ते 18 मार्चदरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपीट झाली. याचा फटका मुळशी, मावळ, हवेली, आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पुरंदर तालुक्यातील शेतीपीक आणि फळपिकांना बसला आहे. सात तालुक्यांतील 43 गावांतील 1 हजार 221 शेतकर्यांच्या 478 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
या शेतकर्यांना अनुदान देण्यासाठी सुमारे 70 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 252 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, भाजीपाला, भुईमूग, बाजरी, गहू, चारा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ जुन्नर 174 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून, यात द्राक्षांचा समावेश आहे. पुरंदरमधील 23.50 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
अजूनही पंचनामे सुरूच
अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असताना शासकीय कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे पंचनामे करण्यास त्यांना नकार दिला होता. त्यामुळे नायब तहसीलदारांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. परंतु, त्यांनीही चालढकलपणा केला. त्यामुळे वेळेत पंचनामे झालेले नाहीत. सध्या अंतिम पंचनामे सुरू आहेत.