सासवड (ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएमएल बस थांब्याजवळील शाखा नं. 1 जोतिचंद भाईचंद ज्वेलर्स ( LLP) येथे काम करणार्या तीन कामगारांनी 905 ग्रॅम सोन्याचे (किंमत रुपये 50 लाख) दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संदीप तानाजी बिचकुले (मॅनेजर, हडपसर), निखिल पांडुरंग भापकर (कॅशियर, रा. सोमेश्वर, बारामती) आणि सागर बाबूराव हिरप (सेल्समन, सासवड, ता. पुरंदर) यांच्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल श्रेणीक शहा (रा. लँर्बन्म पार्क, प्लँट नं. 201, मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे. त्यानुसार सासवड येथील जोतिचंद भाईचंद ज्वेलर्स ( ङङझ) या शाखेतील सोने, चांदी व रोख रक्कमेची नियमित तपासणी चालू असते. सासवड शाखेत संदीप तानाजी बिचकुले हा मॅनेजर आहे. निखिल पांडुरंग भापकर हा दुकानातील पैशांचे सर्व व्यवहार पाहतो. सागर बाबूराव हिरप याचेकडे सोन्याचे गंठण विभाग असतो.
दररोज सायंकाळी मॅनेजर संदीप तानाजी बिचकुले हा दुकानातील दिवसभराच्या पैशांची व स्टॉकची माहिती हडपसर येथील मेन शाखेला देत असतो. दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता हडपसर येथील मुख्य शाखेतील अलका शिंदे (पर्चेस मॅनेजर) त्यांच्या टीमसह सासवड शाखेत आल्या होत्या. त्यांनी दुकानातील स्टॉक तपासला. त्यांना 512 ग्रॅम सोन्याचे दागिन्यांमध्ये तफावत जाणवली.
त्यानंतर दि. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता राजेंद्र गोगरे (हेड मॅनेजर) यांनी सासवड शाखेत येऊन चौकशी केली. त्यानंतर पुन्हा दि. 30 नोव्हेंबर रोजी हडपसर येथील मुख्य शाखेतील अलका शिंदे (पर्चेस मॅनेजर) त्यांचे टीमसह सासवड शाखेत आल्या. त्यांनी संपूर्ण सोन्याचा स्टॉक पुन्हा चेक केला. त्यावेळी त्यांना 1178.610 ग्रॅम सोने कमी दिसून आले.
याकरिता वरील तिघांना हडपसर ब्रँचमध्ये बोलविले. त्या वेळी संदीप तानाजी बिचकुले याने 1178.610 ग्रॅम वजानाचे सोने गि-हाईकांना दिले असून त्याची बिले झालेली नाहीत. हा स्टॉक परत आणून देण्याची जबाबदारी आमची राहील असे सांगितले. निखिल पांडुरंग भापकर याने बांगड्या, गंठण, गोठ आणि अंगठी असे 154.980 ग्रॅम नेलेल्या सोन्याच्या वस्तू परत आणून दिलेल्या आहेत. हा प्रकार संदीप बिचकुले याचे सांगण्यावरून केल्याचे सांगितले. सागर बाबूराव हिरप याने 600 ग्रॅम सोने बँकेमध्ये गहाण ठेवून त्यावर 22 लाख रुपये कर्ज घेतल्याचे सांगितले. तसेच तिघांनीही स्वहस्ताक्षरात तसे कबुली जबाब लिहून दिले आहेत. मात्र, त्यांनी हे सोने आणून न दिल्याने याबाबत तक्रार देण्यात आली.